marathwada mukti sangram din mahiti | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती
marathwada mukti sangram din mahiti, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैद्राबाद संस्थान, जम्मू-काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.
हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैद्राबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निजाम वंशाचे राज्य होते. निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता.
हैद्राबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. त्या काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी हैद्राबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला, तसेच अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले.१९३८ ते १९४८ हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा प्रमुख कालखंड म्हणुन ओळखला जातो. याच काळात मराठवाडा निझामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकिय आंदोलने, विद्यार्थी चळवळी इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलने देखील झाली. हा विरोध मोडून काढण्यासाठी हैद्राबादच्या निजामाने कासीम रझवी याच्या मदतीने रझाकार संघटनेची स्थापन केली आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली. निजामाने या रझाकार संघटनेचा वापर करुन संस्थानातील नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा निजामाचा स्वतःचे राज्य टिकवण्याचा प्रयत्न होत. पण 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला अणखी चालना मिळाली. यातच निजामाच्या हुकूमशाही राजवटीला उघड उघड आव्हान म्हणुन ७ ऑगस्ट रोजी भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस आणि १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणुन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. या आव्हानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात झाली. मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (लघुरुप एम आय एम) या संघटनेच्या माध्यमातून रझाकार नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या मदतीने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरू केले.
मराठवाडयाच्या स्वातंत्र्य संग्रामचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपर्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला.
या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत,गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड,विश्र्वनाथ भिसे,जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. यासीन जूबेर हैद्राबादी मंत्री याने मुक्तीसेनेने ताब्यात घेतलेली परत घेण्याची प्रतिज्ञा केली त्यमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालूक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याला पुढे सरकु दिले नाही यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत, व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते. यामध्ये रामचंद्र धंदेवार हे बाळगिर मठ सरला येथे बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने शहीद झाले त्यावेळी गोदामाय दुथडी भरून वाहत होती. रामचंद्र यांना सिरसागर नावाच्या मर्दाने आपल्या पाठीवरून पैलतीरी आणुन भर पावसात खड्डा केला व त्यांचा विधी पूर्ण केला.
निझाम सरकारचे हे अत्याचार एवढे अनन्वित होते की हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली. शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम सरकारच्या विरोधात पोलीस ऍक्शनची घोषणा केली. 7 सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैद्राबाद संस्थानवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला. त्यानुसार १३ सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु करण्यात आले. या दरम्यान १७ सप्टेंबरला निजामाने माघार घेतली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम संस्थानावर कारवाई सुरू झाली. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर २ तासांत नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करून फौजा पुढे निघाल्या. भारतीय फौजे पुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत. निजामी सैन्य माघार घ्यायला लागले आणि कासीम रझवीला अटक झाली. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी शरणांगती स्वीकारली आणि निझाम सरकारने हार मानली आणि हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.
देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व केले ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी.
7 सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैद्राबाद संस्थानवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला. त्यानुसार १३ सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु करण्यात आले. या दरम्यान १७ सप्टेंबरला निजामाने माघार घेतली. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
हैद्राबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैद्राबादचे विभाजन करण्यास भाग पाडले. तसेच मराठवाडा सहित स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचाही डाव उधळुन लावला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषिक आधारे महाराष्ट्रात सामील करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी देखील मराठवाड्यातील जनतेने मोठे योगदान दिले. त्यानंतर १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
0 Comments